भारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शना’चे ७ ते ९ मे या कालावधीत पुण्यात आयोजन

भारतातील पहिल्या ‘ईआरपी प्रदर्शना’चे ७ ते ९ मे या कालावधीत पुण्यात आयोजन

पुणे/पिंपरी, ता. ५: महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीला डिजिटल युगाशी जोडण्याच्या उद्देशाने भारतातील पहिल्या ‘ईआरपी’ (एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंग) औद्योगिक प्रदर्शनाचे ७ ते ९ मे २०२६ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड येथील ऑटोक्लस्टर एक्झिबिशन सेंटरमध्ये होणारे हे प्रदर्शन सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे, अशी माहिती संयोजक एक्स्पोनॉमिक्स इव्हेंट्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक सागर अहिवळे व मिलिंद हडप यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रसंगी रवींद्र कांबळे, डॉ. प्रकाश मुंडे उपस्थित होते.

सागर अहिवळे म्हणाले, “देशभरातील १०० हून अधिक ईआरपी कंपन्या, तंत्रज्ञान पुरवठादार आणि स्टार्टअप्स यामध्ये सहभागी होणार आहेत. या प्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार महेश लांडगे, ‘डिक्की’चे संस्थापक पद्मश्री मिलिंद कांबळे यांच्या हस्ते होणार आहे. सनवन टेक्नॉलॉजीच्या संचालिका श्रद्धा कुलकर्णी, अप्लिका कन्सल्टन्सीचे प्रमुख रॉड अल्बुकर्क, रिंगफिडरचे सीईओ दीपान रामलिंगम, इंद्रायणी इंडस्ट्रियल असोसिएशनचे अध्यक्ष महेंद्र फणसे, रोटरी क्लब ऑफ पिंपरी इलाईटचे अध्यक्ष इरफान आवटे, डब्ल्यूटीई इन्फ्रा प्रोजेक्ट प्रा. लिमिटेडचे संचालक प्रसाद कुलकर्णी, फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजचे सीईओ दिलीप बटवाल यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. समारोप सोहळ्यात एक्स्पोच्या यशस्वी आयोजनाचा आढावा घेतला जाईल. उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला पुढे नेण्यासाठी आवश्यक दिशा आणि सहकार्याबाबत मार्गदर्शन केले जाईल. हे प्रदर्शन ‘डिजिटल भारत, विकसित भारत’ संकल्पनेला गती देत महाराष्ट्राला स्मार्ट औद्योगिक राज्य म्हणून अधिक बळकट करेल.”

मिलिंद हडप म्हणाले, “हा उपक्रम उद्योग क्षेत्रातील डिजिटल परिवर्तनाला चालना देण्यासाठी आणि ‘एआय व ईआरपी: ट्रान्सफॉर्मिंग एंटरप्राईज एट स्केल’ या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. महाराष्ट्रातील तसेच देशातील उद्योगांना पारंपरिक कार्यपद्धतीतून बाहेर काढून स्मार्ट, डेटा-आधारित आणि तंत्रज्ञान-सक्षम औद्योगिक इकोसिस्टम मध्ये रूपांतरित करणे, हा या प्रदर्शनामागील मुख्य उद्देश आहे. विशेषतः एमएसएमई आणि एसएमई क्षेत्रातील उद्योगांना ईआरपी आणि एआय यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देऊन त्यांची कार्यक्षमता, पारदर्शकता आणि स्पर्धात्मकता वाढविणे हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे.”

या तीन दिवसांच्या एक्स्पोमध्ये विविध औद्योगिक क्षेत्रांसाठी स्वतंत्र झोन्स तयार करण्यात आले असून, उत्पादन, वित्त, लॉजिस्टिक्स, रिटेल, हेल्थकेअर, कन्स्ट्रक्शन, इन्फ्रास्ट्रक्चर आणि एडटेक या क्षेत्रांतील अत्याधुनिक ईआरपी आणि डिजिटल सोल्युशन्स सादर करण्यात येणार आहेत. उद्योग तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चर्चासत्र, मार्गदर्शन सत्रे व कार्यशाळा होणार आहेत. उद्योगांना प्रत्यक्ष अनुभवातून शिकण्याची संधी उपलब्ध होणार आहे. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी विविध उद्योगांसाठी विशेष सेशन्स, बीटूबी नेटवर्किंग, मॅचमेकिंग आणि व्यवसाय संधी निर्माण करण्यावर भर दिला जाईल. सुमारे २०,००० पेक्षा अधिक औद्योगिक अभ्यागत या प्रदर्शनाला भेट देण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे उद्योगांमध्ये नव्या भागीदारी आणि विकासाच्या संधी निर्माण होतील, असे त्यांनी नमूद केले.