डॉ. अनिरुद्ध जोशी यांना केंद्राचा नवउद्यमी पुरस्कार

डॉ. अनिरुद्ध जोशी यांना केंद्राचा नवउद्यमी पुरस्कार

नाडी-तरंगिणी या उपक्रमाची निर्मिती

पुणे : भारतीय उद्योग विश्वात नावीन्यपूर्ण संशोधन करणाऱ्या तरुण संशोधकांना दिल्या जाणाऱ्या नवउद्यमी पुरस्कारावर (स्टार्ट अप इंडिया ॲवॉर्ड) यंदा पुणेकर डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी आपले नाव कोरले आहे. डॉ. जोशी हे प्राचीन भारतीय आयुर्वेदातील नाडीशास्त्रावर आधारित नाडी-तरंगिणी या उपक्रमाचे निर्माते आहेत. देशभरातून आलेल्या २१७७ अर्जामधून ४६ नवउद्यमींची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली. त्यांमध्ये डॉ. अनिरुद्ध जोशी आणि त्यांच्या संशोधनाचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१६ मध्ये नवउद्यमींना प्रोत्साहन देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेतला. त्यामध्ये कृषी, आरोग्य, व्यापार, तंत्रज्ञान, आयात निर्यात अशा एकूण आठ क्षेत्रांचा समावेश आहे. एकविसाव्या शतकात देशाचे सामर्थ्य वाढविणाऱ्या आणि जगभरातील सर्वसामान्यांच्या उपयोगी पडू शकणाऱ्या तरुणांच्या कल्पनांना वाव देण्यासाठी ही योजना सुरू केली. २०२० पासून देशातील आघाडीच्या संशोधक आणि उद्योजकांना गौरवण्यासाठी स्टार्ट अप इंडिया अॅवॉर्ड सुरू करण्यात आले. केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्रालयाकडून हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. करोनामुळे प्रातिनिधिक स्वरूपात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

डॉ. अनिरुद्ध जोशी यांनी विकसित केलेले नाडी-तरंगिणी हे उपकरण नाडीपरीक्षा करून शरीरातील रोगाचे निदान करते. इलेक्ट्रॉनिक आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या साहाय्याने हे उपकरण काम करते. नाडीपरीक्षेतील निरीक्षणांवर आधारित प्रकृती चांगली राखण्याबाबत सूचनाही या उपकरणाद्वारे केल्या जातात. विशेष म्हणजे जगातील १२ देशांमध्ये सध्या नाडी-तरंगिणीचा वापर करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *