पुणे : “रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये (आठवले) कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे. पण निवडणुकीत राजकीय यश मिळवण्यात आपण कमी पडतो. आगामी निवडणुकांत रिपाइंला चांगले यश मिळवायचे असेल तर सर्व जाती-धर्मातील लोकांना सहभागी करून पक्षाला मजबूत करा,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) युवक आघाडी पुणे जिल्हातर्फे पुण्यनगरीच्या उपमहापौर सुनीता वाडेकर यांचा नागरी सत्कार व कोरोनायोद्ध्यांचा सन्मान आणि उमेश कांबळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आठवले यांच्या हस्ते झाले. बावधन बुद्रुक येथील माता रमाई आंबेडकर चौकात झालेल्या या सोहळ्यावेळी ‘रिपाइं’चे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडे पाटील, ऍड. मंदार जोशी, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, कार्याध्यक्ष बसवराज गायकवाड, माहिपाल वाघमारे, उमेश कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.