पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करणार

पत्रकारांना स्वस्तातील घरे देण्यासाठी सहकार्य करणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन; राज्यातील पहिल्या खासगी मीडिया टॉवरचे भूमिपूजन
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भगवती ग्रुपचा संयुक्त उपक्रम; सांगवडेमध्ये उभारणार प्रकल्प

पुणे : “पत्रकारांना स्वस्तातील घरे मिळावीत, यासाठी गृहकर्जावरील व्याजावर सवलत देण्याची योजना आणण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करणार असून, पत्रकारांना आर्थिक स्थैर्य, सामाजिक सुरक्षा देण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल,” असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पुण्यावर आपले विशेष प्रेम व लक्ष आहे. मात्र, पुण्यातून लोकसभा लढविण्याचा विचार नसल्याचा खुलासाही फडणवीस यांनी केला.

 
महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ व भगवती ग्रुपच्या वतीने उभारण्यात येणार्‍या खासगी तत्त्वावरील महाराष्ट्रातील पहिला मीडिया टॉवरचे भूमिपूजन डिजिटल स्वरुपात देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील जेडब्ल्यू मेरियट हॉटेलमध्ये झालेल्या सोहळ्याप्रसंगी पुढारीचे समूह संपादक डॉ. योगेश जाधव, सकाळचे समूह संपादक सम्राट फडणीस, लोकमतचे संपादक संजय आवटे, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल, पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह, भगवती ग्रुपचे चेअरमन बाबासाहेब औटी, पत्रकार संघाचे पुणे जिल्हाध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.
 
नवी दिशा देणारा प्रकल्प पुण्यात उभारला जात असल्याचे सांगून देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रातील इतर शहरात असे प्रकल्प होतांना पहायला मिळतील. पत्रकारांच्या अनेक अडचणी आहेत. त्यांची स्वत:ची हक्काची घरे आढळून येत नाही. त्यामुळे पत्रकारांच्या घराचा प्रकल्प मोहिम म्हणून हाती घ्यावा लागेल. माध्यमांची संख्या आणि प्रकार वाढले आहेत. सर्वसामान्य घरातील तरुण-तरुणी या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनात स्थैर्य येणे ही महत्वाची बाब आहे. माध्यमे स्वतंत्र आणि नि:ष्पक्ष राहण्यासाठी माध्यम संस्थेतील शेवटच्या घटकांना सामाजिक सुरक्षा द्यावी लागेल.”
“पत्रकार हल्ला विरोधी कायदा मंजूर करण्यात आला आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना सर्व पत्रकारांना लागू करण्यात आली आहे, त्याची व्याप्ती वाढवून त्यांचे कुटुंबियही या योजनेच्या कक्षेत आणण्याचा प्रयत्न आहे. म्हाडाच्या लॉटरीतही पत्रकारांना मुंबईत घरे मिळाली. मात्र पत्रकारांच्या वाढती संख्या लक्षात घेता त्या प्रमाणात ही संख्या कमी आहे. महापालिका आणि पीएमआरडीएने नियमात बसवून घरांची किंमती कमी करण्याबाबत विचार करावा. मीडिया टॉवरसाठी जागा मिळविणे महत्वाची बाब असून, महसूली मुख्यालयी असे प्रकल्प उभारण्यासाठी सहकार्य करण्यात येईल, त्यासाठी आवश्यक असल्यास स्वतंत्र अधिकारी नेमण्यात येईल,” असेही देवेंद्र फडणवीस यांनी नमूद केले.
 
 
डॉ. योगेश जाधव म्हणाले, “पत्रकारांना निवृत्ती वेतन देण्याचा उपक्रम देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केला. शेतकरी, पत्रकार वा अन्य समाज घटकांच्या अडचणी सोडविण्यात त्यांचा पुढाकार असतो. पत्रकारांची संख्या अलीकडच्या काळात वाढली आहे. अशावेळी राज्यातील पत्रकारांना स्वतःचे घर देण्यासाठी हाती घेतलेला हा उपक्रम महत्त्वाचा आहे. घर म्हणजे केवळ चार भिंती आणि छप्पर म्हणजे घर नाही. भावभावनांचा, नात्यांचा संगम असतो, तिथे घर असते. सर्व पत्रकार एकमेकांच्या जवळ राहतील, त्यांच्यात ऋणानुबंध तयार होतील, हे आनंददायक आहे.”
 
संजय आवटे म्हणाले, “आजचा कार्यक्रम आश्वासक आहे. पत्रकारांचा एक स्वतंत्र टॉवर असावा, हे स्वप्न पाहणे आणि ते पूर्णत्वास नेणे कौतुकास्पद आहे. संपादक म्हणून देवेंद्र फडणवीस हे माझे आवडते मुख्यमंत्री आहेत. पुण्याविषयी, पत्रकारांविषयी त्यांना आस्था आहे. कोटीच्यावर लोकसंख्या असलेल्या पुण्यात पत्रकारांना घरे मिळत आहेत, ही आनंदाची गोष्ट आहे.”
 
सम्राट फडणीस म्हणाले, “सर्व पत्रकारांना एकत्रित आणण्याचा हा उपक्रम स्तुत्य आहे. चौथा स्तंभ आज आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे. पत्रकारांना चांगले वेतन, सुविधा मिळाल्या, तर समाजाला पूरक पत्रकारिता होईल. रिंग रोडला लागून महामार्गालगत होणार हा प्रकल्प सर्वांसाठी सोयीचा होईल.”
 
बाबासाहेब औटी म्हणाले, “लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना परवडणाऱ्या किमतीत घरे देण्याचा हा प्रयत्न आहे. पुढील दोन वर्षांच्या काळात हा प्रकल्प प्रत्यक्षात येईल. गरजेनुसार नोंदणी करून पत्रकारांना ही घरे  देण्यात येतील. या प्रकल्पाला पुढारीचे शिल्पकार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांचे नाव देताना आम्हाला आनंद वाटतो आहे.”
 
संजय भोकरे म्हणाले, “दुसऱ्यांच्या व्यथा मांडणारा पत्रकार मात्र अनेक व्यथांनी ग्रस्त असतो. या घटकांसाठी शाश्वत असे काही करावे, या भावनेतून पत्रकार संघाने पत्रकारांच्या घरांचा पहिला गृहनिर्माण प्रकल्प भगवती ग्रुपच्या सहकार्याने साकार करण्यास प्रारंभ केला आहे. आगामी काळात राज्यभरात असे प्रकल्प उभे राहतील. त्यासाठी सरकारचेही सहकार्य असावे.”
 
प्रास्ताविकात किरण जोशी म्हणाले, “पत्रकारांना हक्काची घरे मिळावीत, यासाठी हा प्रयत्न आहे. पुण्यातून सुरू झालेला हा उपक्रम लवकर राज्यभर राबविण्यात येणार असून, राज्यातील पत्रकारांना घरे देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.” संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले आणि आभार मानले.

पुणे भविष्यातील महत्वाचे औद्योगिक केंद्र : फडणवीस

येत्या २० वर्षातील देशाचे ग्रोथ इंजिन होण्याची पुण्याची आणि पीएमआरडीएची क्षमता आहे. नव्या युगाचे उद्योग समाविष्ट करण्याची क्षमता असणारे हे शहर आहे. रिंगरोडसारखे विकासाचे प्रकल्प प्राधान्याने हाती घेण्यात येत आहेत. पुण्याच्या वेगवान विकासासाठी नवे विमानतळ आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांना याबाबतच्या शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यात येईल. विमानतळासाठी जमीन दिलेल्यांना समृद्ध होण्याचा अनुभव होईल, असे पॅकेज देण्यात येईल. पुण्याच्या  विकासासाठी जनआंदोलन उभे राहण्याची गरज आहे. देशाचे येत्या काळातील महत्वाचे केंद्र म्हणून पुण्याची ओळख प्रस्थापित होईल. त्याकामी माध्यमांनी जनजागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले.

 
 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *