पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांना पक्के, मालकी हक्काचे घर

पंतप्रधान आवास योजनेमुळे गरिबांना पक्के, मालकी हक्काचे घर

डॉ. सुजय विखे पाटील यांचे मत; कम्युनिटी डिझाईन एजन्सी, स्नेहालय आणि अहमदनगर महापालिका
यांच्या पुढाकारातून झोपडपट्टीवासीयांना प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पक्की घरे सुपूर्द
 
 अहमदनगर : “पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या नेतृत्वात पंतप्रधान आवास योजनेद्वारे आर्थिक मागास व अल्प उत्पन्न गटातील कुटुंबानाही चांगली घरे मिळत आहेत. सरकार, सामाजिक संस्था आणि नागरिक एकत्रित येऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपमध्ये (Public Private Partenership) PPP उभारलेला हा प्रकल्प आदर्शवत आहे. वस्तीत राहणाऱ्या या कुटुंबाना हक्काचे घर मिळावे म्हणून स्नेहालय  (Snehalaya) संस्थेने पुढाकार घेऊन कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या मदतीने हा प्रकल्प उभारला,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले.
 
कम्युनिटी डिझाईन एजन्सी (करी स्टोन फाउंडेशन) Community Design Agency – Curry Stone Foundation, US, स्नेहालय आणि अहमदनगर महापालिका (Ahmednagar Municipal Corporation) यांच्या पुढाकारातून संजयनगर, काटवण खंडोबा मंदिर येथील झोपडपट्टीवासीयांना (Slum) प्रधानमंत्री आवास योजनेत पक्की घरे आज सुपूर्द करण्यात आली. डॉ. सुजय विखे पाटील (Dr. Sujay Vikhe Patil, MP) यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वप्नपूर्ती या गृहप्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार पडला. शहरातील संजयनगर भागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या नागरिकांचा आज आपल्या नवीन घरात ‘गृहप्रवेश’ झाला. येथील ३३ कुटुंबीयांची आपल्या हक्काच्या पक्क्या घराची ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे.
 
यावेळी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पुष्पा बोरुडे, उपसभापती मीनाताई चोपडा, नगरसेवक अनिल शिंदे, सुवर्णा जाधव, प्रशांत गायकवाड, विद्या खैरे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पाठारे, शाखा अभियंता गणेश गाडळकर, कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या नायडू जनार्धन, स्नेहालय संस्थेचे अध्यक्ष संजय गुगळे, गिरीश कुलकर्णी, संजय बंदिष्टी आदी उपस्थित होते.
 
डॉ. सुजय विखे पाटील म्हणाले, “बारीकसारीक गोष्टींची काळजी यामध्ये घेण्यात आली आहे. केंद्र सरकारकडून जास्तीतजास्त निधी आणून असे प्रकल्प उभारण्यासाठी पुढाकार घेणार आहे. पंतप्रधान आवास योजनेतील एकही कुटुंबाचा निधी प्रलंबित राहू देणार नाही. तसेच या प्रकल्पातील सदनिकांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्यासाठी खासदार निधी उपलब्ध करून देईल. पक्षविरहित, राजकारणविरहित विकासकामे झाली, तर देशाची प्रगती अतिशय वेगाने होईल. विकासकामांच्या बाबतीत आपण सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करावेत. कारण पैसे, पद यापेक्षा गरिबांचे आशीर्वाद अधिक महत्वाचे आहेत.
 
समाजातील विविध विषमतांवर काम करण्याचा ‘सीडीए’चा (CDA) मानस आहे. त्यातूनच समाजाचे प्रश्न सुटू शकतील, असा विश्वास त्यांना वाटतो. केवळ व्यक्तिगत घरांची उभारणी करून गृहनिर्माणातील असमानता दूर होणार नाही, तर त्यासाठी आपल्याला एकत्रित समुदायांची निर्मिती करावी लागेल, असे कम्युनिटी डिझाईन एजन्सीच्या व्यवस्थापकीय संचालक संध्या नायडू जनार्धन यांनी नमूद केले. पाणी, रस्ते, पथ दिवे, सांडपाणी व्यवस्था, बालके व समुदायांसाठी विरंगुळा केंद्र, आरोग्य संवर्धन, मनोरंजनासाठी जागा, पोषक वातावरण आणि उद्यान, दुकाने अशा विविध सोयीसुविधांची रचना या प्रकल्प उभारणीत केली आहे, असल्याचे त्यांनी सांगितले.
 
संजयनगर येथील रहिवासी, अहमदनगर महानगरपालिका, स्नेहालय संस्था आणि करी स्टोन फाउंडेशनचा उपक्रम असलेल्या कम्युनिटी डिझाईन एजन्सी (सीडीए) यांच्या एकत्रित प्रयत्नातून प्रधानमंत्री आवास योजनेतून (पीएमएवाय) उभारण्यात आलेल्या ३३ घरांच्या गृहप्रकल्पामुळे ही ‘स्वप्नपूर्ती’ झाली आहे. उर्वरित २६५ घरांचे बांधकाम नोव्हेंबर २०२२ मध्ये सुरु होणार आहे. महापालिकेच्या दोन एकर जागेत वसलेली आणि एकमेकांशी अतिशय घट्ट वीण असलेली संजयनगर ही २९८ कुटुंबाची झोपडपट्टी वस्ती आहे. २०१८ मध्ये हा झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प प्रायोगिक स्वरूपात सुरु झाला होता. चार वर्षांच्या प्रयत्नातून, नियोजनातून, काटेकोर संरचनेत उभारलेला हा संजयनगर पुनर्विकास प्रकल्प चांगले राहणीमान उपलब्ध करून देणारा आदर्श नमुना ठरला आहे.
 
“या २९८ कुटुंबाना एकत्रित आणण्यासाठी, या प्रकल्पावर एकमत होण्यासाठी आमच्या कार्यप्रणालीत दृढ इच्छाशक्ती, संयम आणि अष्टपैलुत्व विचारांची गरज होती,” असे स्नेहालयचे सहायक संचालक हनीफ शेख यांनी सांगितले. एकदा का येथील कुटुंबाना पुरेसा प्रकाश, खेळती हवा, शुद्ध पाणी आणि स्वच्छतेच्या सुविधा मिळाल्या की त्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्यदायी घरे, नोकऱ्या आणि प्रशिक्षण, समाजाचे जीवनमान उंचावणारे उपक्रम, महिलांना घरांचा मालकी हक्क आदींमधून सक्षमीकरण करणे, हे या सर्व संस्थांचे एकमेव ध्येय आहे. आर्थिक समावेशन हा या परिवर्तनातील एक  महत्वाचा घटक होता. ‘रंग दे’ या सामाजिक संस्थेच्या सहकार्याने लोकांना कमीतकमी व्याजदर आणि योग्य कर्ज मिळवून देण्यासाठी प्रयत्न झाले. असे संध्या नायडू यांनी सांगितले.

 

संजयनगरचा पुनर्विकास (Redevelopment) हा पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये (पीपीपी) भारत सरकाराच्या अर्थसाहाय्याने, अहमदनगर महापालिका आणि अमेरिका स्थित (United States) करी स्टोन फाउंडेशनच्या पाठिंब्याने झाला आहे. यासाठी लागणारे अतिरिक्त अर्थसहाय्य (Funding) समाजातील दानशूर व्यक्ती, संस्थांकडून उभारले जात आहे. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी  www.communitydesignagency.com  या संकेतस्थळाला भेट द्यावी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *