हास्ययोग चळवळ समाजाला सकारात्मक, सुदृढ बनवतेय – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन;

हास्ययोग चळवळ समाजाला सकारात्मक, सुदृढ बनवतेय – चंद्रशेखर बावनकुळे यांचे प्रतिपादन;

 नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे जागतिक हास्ययोग दिन साजरा

पुणे दि. ४ –  “नवचैतन्य हास्ययोग परिवार ही समाज सकारात्मक करणारी आरोग्याची चळवळ आहे. शारीरिक आरोग्याबरोबरच हास्यामुळे मानसिक आरोग्य चांगले राहते. जगामध्ये आज १२० देशात जागतिक हास्यदिन साजरा होत आहे. हास्यामुळे सकारात्मकता येते. सकारात्मक विचारांची माणसे समाजात चांगला बदल घडवतात. मनाने प्रसन्न असणारी माणसे दुसऱ्यांचे दुःख दूर करण्यासाठी मदत करतात. म्हणूनच ज्येष्ठांबरोबरच तरुण माणसेही या पद्धतीचा उपयोग करत आहेत,” असे प्रतिपादन राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

जागतिक हास्ययोग दिनानिमित्त नवचैतन्य हास्ययोग परिवारातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात आयोजिलेल्या विशेष हास्ययोग कार्यक्रमात चंद्रशेखर बावनकुळे बोलत होते. प्रसिद्ध साहित्यिक व व्याख्याते डॉ. संजय कळमकर यांचे ‘आनंदाच्या वाटा’ या विषयावर व्याख्यान झाले. प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश महामंत्री राजेश पांडे, जयराज ग्रुपचे राजेश शहा, प्रसिद्ध व्यावसायिक प्रकाश धोका, पितांबरी प्रोडक्ट्सचे महेश जोशी, किरण दगडे पाटील, नवचैतन्य हास्ययोग परिवाराचे संस्थापक विठ्ठल काटे व सुमन काटे (व्हर्च्युअली), हास्ययोग परिवाराचे मुख्य समन्वयक मकरंद टिल्लू, उपाध्यक्ष विजय भोसले, सचिव पोपटलाल शिंगवी, खजिनदार ऍड. रामचंद्र राऊत, विश्वस्त जयंत दशपुत्रे, प्रमोद ढेपे, दत्तात्रय कुंदेन, ऍड. एकनाथ सुगावकर, सुनील देशपांडे, अतुल सलाग्रे, हरीश पाठक आदी उपस्थित होते.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “जीवन सकारात्मक असेल, तर शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहते. आनंदी व सुदृढ समाजासाठी ही चळवळ मोलाचे योगदान देत आहे. ताणतणावापासून दूर राहण्यास हास्ययोगाचा उपयोग होतो. एखाद्या चिकित्सेप्रमाणे आज हास्ययोग काम करत असून, जागतिक स्तरावर याला मान्यता आहे. विठ्ठल काटे, मकरंद टिल्लू यांच्या पुढाकाराने एक लाख लोकांपर्यंत ही चळवळ पोहोचणार, यात काही शंका नाही. पुण्यात सुरु झालेली ही चळवळ नागपुरातही सुरु व्हावी.”

‘आनंद वाटा’वर विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. संजय कळमकर म्हणाले, “आपण जीवन जगताना आनंदातही चुका शोधत बसतो. तसे न चुकांमध्येही आनंद शोधण्याची सवय लावून घ्यायला हवी. सकारात्मक वृत्तीने आनंदाचा शोध घेत वाटचाल करत राहिलो, तर जीवन अधिक आनंदी होते. हास्ययोग ही सकारात्मक जीवन जगण्यासाठीची संजीवनी आहे.”

राजेश शहा यांनी हास्ययोग समाजात सकारात्मकता पेरत असल्याचे सांगितले. आगामी काळात एच. व्ही. देसाई हॉस्पिटलच्या माध्यमातून पुण्याला मोतीबिंदू मुक्त करण्याचा उपक्रम राबवणार आहोत. अधिकाधिक नागरिकांनी डोळ्यांची तपासणी करून घ्यावी. देसाई रुग्णालयात मोफत डोळ्यांची शस्त्रक्रिया करण्यात येईल, असे शहा यांनी नमूद केले.

गेल्या २८ वर्षांपासून नियमित हास्ययोग करत असल्याने आजवर कोणताही आजार झाला नाही. त्यामुळे हास्ययोग खूप महत्वाचा असल्याचे प्रकाश धोका म्हणाले. महेश जोशी यांनी हास्ययोग चळवळ अधिक व्यापक व्हावी. ती घराघरात पोहोचावी. सध्याच्या धकाधकीच्या काळात लोकांच्या चेहऱ्यावर हसू परत आणण्याचे काम ही चळवळ करत असल्याचे ते म्हणाले.

मकरंद टिल्लू म्हणाले, “जगामध्ये हास्य क्लब ही चळवळ सुरू होण्याचे हे तिसावे वर्ष आहे. नवचैतन्य हास्ययोग परिवार २३५ शाखांच्या माध्यमातून २५ हजार लोकांना रोज हास्ययोग करायला लावते. एक लाख लोकांना या हास्य चळवळीत जोडून घेण्याचे उद्दिष्ट्य आहे.”

यानिमित्ताने हास्ययोगाचे प्रकार, मनोगते, मान्यवरांचे सत्कार झाले. बालगंधर्व रंगमंदिर खचाखच भरून गेले होते. उपस्थितांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हास्ययोग केला. विजय भोसले यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. हर्षदा टिल्लू यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. एकनाथ सुगावकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *