खा. मीनाक्षी लेखी यांचे मत; भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो बिजनेस कल्चरल काउंसिलचे उद्घाटन
पुणे : ‘भारत, त्रिनिनाद आणि टोबॅगो देशात परस्परांना व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमने (जीआयबीएफ) या तिन्ही देशांतील राजदूत, उद्योजक एकत्र आणून, बिझनेस कल्चरल कौन्सिल सुरु केले आहे. ‘जीआयबीएफ’च्या या उपक्रमामुळे या तिन्ही देशांतील व्यापारी संबंध आणखी मजबूत होतील,” असे मत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी व्यक्त केले.
‘जीआयबीएफ’च्या वतीने नवी दिल्ली येथे भारत-त्रिनिदाद आणि टोबॅगो बिजनेस कल्चरल काउंसिलचे उद्घाटन, तसेच ‘नॅशनल एमएसएमई अवॉर्ड्स फॉर बिजनेस एक्सलेंस’चे वितरण झाले. विविध देशांचे राजदूत, पुरस्कारार्थी उद्योजक उपस्थित होते. त्यामध्ये ग्लोबल इंडिया बिजनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, त्रिनिदाद व टोबॅगोचे आयुक्त डॉ. रॉजर गोपाल, अमेरिकेचे वरिष्ठ राजदूत डॉ. प्रिथा राजाराम, झिम्बाब्वेचे राजदूत डॉ. जी. एम. चिपारे, बेलारुसचे महामहिम आंद्रेई रिज्युस्की, गुयानाचे महामहिम चरणदास पर्सोद, नायजेरियाच्या उच्चायुक्त तिजानी एल्ड्रिस, फिजीचे उच्चायुक्त एलीया सेवूतीया, ‘जीआयबीएफ’च्या संचालिका दीपाली गडकरी यांच्यासह भारतीय लोकसभेचे सचिव व अन्य मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते भारतीय उद्योजकांचा सन्मान करण्यात आला.
डॉ. रॉजर गोपाल भारताचे कौतुक करत म्हणाले की, “भारताचे लोक फार चांगले आहेत. आम्ही त्यांच्याशी व्यावसायिक नाते मजबूत बनवू इच्छितो. आमच्या देशात भारतासाठी व्यापाराच्या संधी खुल्या आहेत.” पुरस्कारप्राप्त उद्योजकांनी पुरस्कार मिळाल्याचा आनंद व्यक्त केला. हा पुरस्कार अधिक चांगले काम करण्याची प्रेरणा देत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
डॉ. जितेंद्र जोशी म्हणाले, “मोदी सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला साकार करण्याचे काम ‘जीआयबीएफ’च्या माध्यमातून सुरु आहे. विशेषतः नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यात आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. त्याचा उपयोग त्यांना व्यापार जगतात त्यांच्या ओळखी वाढण्यात होत आहे. व्यापार आणि रोजगाराच्याही संधी यामुळे वाढत आहेत.” दीपाली गडकरी यांनीही ‘जीआयबीएफ’च्या माध्यमातून उद्योजकता विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली.