क्लिनिकल ट्रायलमध्ये उपयुक्तता सिद्ध; कोल्हापूर येथील श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटरचे संशोधन
पुणे : कोविड-१९, ओमीक्रॉन अशा विषाणूजन्य आणि संसर्गजन्य आजारामुळे सामाजिक आरोग्य धोक्यात आले आहे. हे सामाजिक आरोग्य सदृढ राखण्यासाठी ‘माधव रसायन’ हे औषध प्रभावी आणि उपयुक्त ठरले आहे. विश्वपंढरीचे अध्यक्ष आनंदनाथजी सांगवडेकर यांच्या संकल्पनेतून आणि विश्ववतीचे अध्यक्ष निरंजनदासजी सांगवडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर कोल्हापूर येथील संशोधकांच्या टीमने ‘माधव रसायन’ विकसित केले आहे. सदर औषधाची उपयुक्तता कोविड-१९ मधील क्लिनिकल ट्रायल वैज्ञानिक पातळीवर सिद्ध झाली आहे, अशी माहिती एम्प्रेस्क हेल्थकेअरच्या सहसंस्थापक व संचालक डॉ. गायत्री गानू यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. गायत्री गानू म्हणाल्या, “विषाणूजन्य आजारामध्ये ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी, ऑक्सिजनची पातळी कमी होणे अशा विविध लक्षणांमध्ये अतिशय उपयुक्त असे ‘माधव रसायन’ आयुर्वेदिक औषध निर्माण करण्यात आले. पुण्यातील लोकमान्य हॉस्पिटल येथे डॉ. समीर जमदग्नि, डॉ. प्रसाद पांडकर, डॉ. तुषार सौंदाणकर, डॉ. गिरीश शिर्के, डॉ. शैलेश मालेकर आणि डॉ. विद्याधर वैद्य या टीमअंतर्गत पार पडलेल्या क्लिनिकल ट्रायलमध्ये कोविड-१९ पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांमध्ये माधव रसायन या आयुर्वेदिक औषधाचा वापर करण्यात आला. सलग दहा दिवस वेगवेगळ्या मात्रेमध्ये माधव रसायन डोस घेणाऱ्या रुग्णांमध्ये ताप, सर्दी, अंगदुखी यादी लक्षणे येऊन कोविड-१९ ची टेस्ट पाचव्या दिवशी निगेटिव्ह आली आणि दहाव्या दिवशीपर्यंत सर्व लक्षणे नाहीशी झाली. तसेच आयसीयू, कृत्रिम ऑक्सिजन पुरवठा, दीर्घ कालीन औषधोपचार या सर्वांची गरज या रुग्णांमध्ये भासली नाही.”
“या सर्व प्रक्रियेमध्ये कोविड-१९ मुळे शरीरातील व्हायटल आणि सॉफ्ट ऑर्गन्स जसे की हृदय, फुफ्फुस, मेंदू, किडनी इत्यादी अवयवांवर होणारे दुष्परिणाम तसेच मानसिक लक्षणांपैकी विस्मरण, अनिद्रा इत्यादी लक्षणे देखील नाहीशी होताना निदर्शनास आली. आयुर्वेदामध्ये उदर्क आणि उपद्रव या संज्ञेअंतर्गत या सर्वांचे खूप सुंदर असे वर्णन आढळते; एखादा आजार झाल्यामुळे त्याच्याशी संलग्न इतर आजार निर्माण होणे म्हणजेच मूळ आजाराचा ‘उपद्रव’ आणि एखादा आजार बरा झाल्यानंतर त्यापासून इतर काही लक्षणात्मक पैलू नव्याने निष्पन्न होणे म्हणजे ‘उदक’ होय. जसे की कोविड-१९ होऊन गेल्यानंतर स्ट्रोक, हार्ट अटॅक, फेशियल पाल्सी, अव्हॅस्क्युलर नेक्रोसिस पासून ते केस गळणे, झोप न येणे, ताणतणाव, विस्मरण, आत्मविश्वासाची कमतरता इथेपर्यंत उदर्क स्वरूप लक्षणे पाहायला मिळतात. यातूनच सामाजिक आरोग्याची पातळी दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे हे निदर्शनास येते आणि त्यासाठीच ‘माधव रसायन हे औषध अतिशय उपयुक्त सिद्ध झालेले आहे.”
सध्या कोविड-१९, ओमीक्रॉनच्या निरनिराळ्या अवस्थेतील विविध लक्षणांनुसार ‘माधव रसायन’ हे औषध डॉक्टर अथवा वैद्यांच्या सल्ल्यानुसार विविध मात्रेमध्ये वापरून या औषधाचा दीर्घ आयाम अनुभवास येत आहे. यासाठीच कोविड-१९ झालेल्या किंवा होऊन बरा झालेल्या रुग्णांचे आरोग्य सुधारून सामाजिक आरोग्य नव्याने प्रस्थापित करण्यासाठी माधव रसायन घेण्याचे आवाहन श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर कोल्हापूरच्या वतीने डॉ. गिरीश शिर्के, डॉ. तुषार सौंदाणकर, डॉ. राहुल शेलार आणि डॉ. अभय जमदग्नी यांनी केले आहे.