रामदास आठवले यांचे प्रतिपादन; भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ‘भारताची भीमज्योत’ उपक्रम

रामदास आठवले यांचे प्रतिपादन; भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने ‘भारताची भीमज्योत’ उपक्रम

पुणे, ता. २८: “संविधानाचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर हे खऱ्या अर्थाने लोहपुरुष, शक्तिपुरुष व द्रष्टे नेते होते. बाबासाहेबांच्या विचारांवर आणि संविधानाच्या तत्वांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्य करीत आहेत. भाजपने सर्व समाजाला सोबत घेऊन ‘सबका साथ, सबका विकास’ ही भूमिका मांडली असून, बाबासाहेबांचे संविधान मजबूत करण्यासाठी दीक्षाभूमी ते चैत्यभूमी असा प्रवास करत निघालेली ही भीमज्योत अवघ्या विश्वाला प्रकाशाची वाट दाखवेल,” असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
 
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भाजप अनुसूचित जाती मोर्चा, महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या संकल्पनेतून ‘भारताची भीमज्योत’ दीक्षाभूमी ते चैत्यभूमी, बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारताचा अनुभव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. गंज पेठेतील सावित्रीबाई फुले स्मारकात झालेल्या या कार्यक्रमावेळी रामदास आठवले बोलत होते. प्रसंगी माजी मंत्री भाई गिरकर, उपमहापौर परशुराम वाडेकर, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, माजी खासदार सुनील गायकवाड, ‘रिपाइं’चे शहराध्यक्ष संजय सोनावणे, नगरसेवक अजय खेडेकर, पल्लवी जावळे, मनीषा लडकत, अमर आवळे, नंदा आबनावे, प्रियांका शेंडगे, अर्चना जगताप, हर्षदा भोसले, वीणा घोष, निलेश आल्हाट यांच्यासह पुणे व पिंपरी-चिंचवड येथील पदाधिकारी उपस्थित होते.
 
रामदास आठवले म्हणाले, “दलित, सवर्ण व बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी माझा प्रयत्न आहे. बुद्धाचे तत्वज्ञान अंगीकारत बाबासाहेबांनी संपूर्ण मानवजातीचे कल्याण करणारे संविधान देशाला दिले. संविधान कोणीही बदलू शकत नाही. काँग्रेस आणि विरोधी पक्ष केवळ तशा वावड्या उठवत आहे. मात्र, चैत्यभूमीवर भव्य स्मारक साकारण्यात नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनीच पुढाकार घेतल्याचे आपण पाहिले. विश्वजित गायकवाड यांच्यासारख्या युवकाला पाठबळ देण्याचे काम भाजप करीत आहे. मी ज्यांच्यासोबत असतो, त्यांची सत्ता आल्याशिवाय राहत नाही. जोवर मी भाजपसोबत आहे, तोवर भाजपाची सत्ता येणार असून, मला चौथ्यांदा मंत्री होण्याची संधी मिळणार आहे.”
 
“पश्चिम बंगालमध्ये भाजपची सत्ता येणार आहे. ममता बॅनर्जी व अन्य नेत्यांनी पराभव स्वीकारून जिंकून येणाऱ्या भाजपचे अभिनंदन करायला हवे. देशात महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्यासाठी एनडीए सरकार कटिबद्ध असून, पुढील काळात याबाबत जागृती करून हे विधेयक पारित करू. दलित समाजाची ताकद मोठी असून, कोणाला पडायचे आणि कोणाला निवडून आणायचे, हे माझ्या हातात आहे. काँग्रेसने महिलांना जसा विरोध केला, तसा मलाही केला होता. पंढरपूरमधून खासदार झाल्यावर मंत्री केले नव्हते, तर शिर्डीमध्ये मला जाणूनबुजून पराभूत केले होते, त्यामुळे मी काँग्रेसची साथ सोडून भाजपमध्ये गेलो आणि भाजपाची सत्ता आली,” असेही आठवले यांनी नमूद केले.
 
रामदास आठवले पुढे म्हणाले की, “दलित समाजाला पुढे नेण्याचे काम मी करत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी जे महान कार्य सुरू केले, त्याच विचारधारेचा वारसा पुढे नेण्याचा माझा प्रयत्न आहे. माझे राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजाच्या उन्नतीसाठी आहे. मी भाजपासोबत आहे असे म्हणण्यापेक्षा भाजपा माझ्यासोबत आहे, असे मी मानतो. कारण माझा केंद्रबिंदू हा नेहमीच समाजहित राहिला आहे. मी कोणत्याही पदासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी काम करत नाही, तर वंचित, दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. मी नरेंद्र मोदींसोबत त्यांच्या विचारांमुळे आणि विकासाच्या दृष्टिकोनामुळे आहे. समाजातील सर्व घटकांना मुख्य प्रवाहात आणणे, समान संधी निर्माण करणे आणि देशाला पुढे नेणे, हा आमचा समान उद्देश आहे.”
 
भाई गिरकर म्हणाले, “बाबासाहेब हे एकच असे महापुरुष आहेत, ज्यांची जयंती दीड महिना जगभर साजरी होते. देश-परदेशात जाऊन त्यांनी ३२ हुन अधिक पदव्या घेत उच्च शिक्षण घेतले. संविधान दिले. आज आपण त्यांनी दाखवलेल्या मार्गावरून चालत आहोत. भाजपाला मोठा जनाधार मिळत असून, संपूर्ण अनुसूचित जातीतला समाज भाजपसोबत आहे. संविधानाला राष्ट्रीय ग्रंथ मानून मोदी काम करत आहेत. त्यामुळे २०२९ मध्येही भाजपच सत्तेवर येणार आहे. विरोधक चुकीचा नॅरेटिव्ह पसरवत असले, तरीही भाजप हाच देशासाठी योग्य पर्याय आहे.”
 
विश्वजित गायकवाड म्हणाले, “समाजाला पुढे घेऊन जायचे असेल, तर सत्तेत असायला हवे, हा संदेश बाबासाहेबानी दिला होता. हाच विचार घेऊन आठवले साहेब नेहमी करत आहेत. सत्ता कोणत्याही पक्षाची असो, आठवले सत्तेत सहभागी असतात. समाजाला न्याय देण्याचे काम करतात. बाबासाहेबांनी पाहिलेला स्वप्नातला भारत या भीमज्योतमधून समाजासमोर ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे. संविधानाची तत्वे, बाबासाहेबांचे विचार योग्य पद्धतीने लोकांसमोर घेऊन जाणे आणि विरोधकांचे खोटे नॅरेटिव्ह खोडून काढण्याचे काम आम्ही यापुढे करत राहू.”
 
धीरज घाटे म्हणाले, “अपप्रचार खोडण्यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. बाबासाहेबानी चळवळीला आयुष्य दिले, समाज उभा राहिला, देशाच्या विकासात योगदान दिले. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाच्या आदर्शांना समोर ठेवून वाटचाल करूया. देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाऊया.”