Post Views: 70
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचे प्रतिपादन; वंचित विकास व उदयकाळ फाउंडेशनतर्फे ‘अभया’ राज्यस्तरीय परिषद
पुणे: “देशभरात महिला अत्याचाराच्या तक्रारींमध्ये मोठी वाढ होत आहे. राज्य व राष्ट्रीय महिला आयोग, कौटुंबिक न्यायालयात लाखो तक्रारी प्रलंबित आहेत. ५०-६० टक्के तक्रारी कौटुंबिक वादाच्या असून, या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी राष्ट्रीय महिला आयोगाने देशभर ‘महिला आयोग आपल्या दारी’ अभियान हाती घेतले आहे. विभागवार सुनावण्या घेऊन या तक्रारींचे निराकरण केले जात आहे,” असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले. दिव्यांगांप्रमाणे ‘अभया’लाही सन्मान देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन रहाटकर यांनी दिले.

वंचित विकास व उदयकाळ फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अभया अभियानांतर्गत आयोजित दोन दिवसीय ‘अभया’ राज्यस्तरीय परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी विजया रहाटकर बोलत होत्या. लोहगाव येथील नीहार आनंदनिवासमध्ये आयोजित परिषदेत वंचित विकास संस्थेचे अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, कार्यवाह व संचालक मीना कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, मीनाक्षी नवले, देवयानी गोंगले, रंजना चव्हाण, आणि उदयकाळ फाउंडेशनचे बाळकृष्ण बागुल, मयूर बागुल आदी उपस्थित होते. महाराष्ट्रातील एकल महिलांवर काम करणाऱ्या विविध जिल्ह्यातील ५० सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले आहेत.
विजया रहाटकर म्हणाल्या, “भारतीय कुटुंबपद्धती समाजव्यवस्थेचा आदर्श होता. मात्र, अलीकडच्या काळात विभक्त कुटुंबपद्धतीने समाजात अस्थिरता वाढली आहे. महिला एकाकी पडत आहेत. महिला घरदार सांभाळून घेत असते. मात्र, तिच्यावर वेळ येते, तेव्हा परिस्थिती, जवळची माणसे कठोर होतात. असंख्य अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. मान, सन्मान व स्वतःच्या हक्कांसाठी झगडावे लागते. महिला सन्मान व संरक्षणासाठी कायदे आहेत. तरीही अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत. समाज म्हणून आपण भान जपायला हवे. मनातून आणि डोक्यातून एकल महिला ही कल्पना काढून टाकली आणि त्यांना अभय संबोधले, त्यांना आपल्यात सामावून घेतले, तर त्यांचे एकाकीपण दूर होण्यास निश्चित मदत होईल.”
“अभया ही सक्षम असते, तिला आधाराची, सकारात्मक मानसिकता देण्याची गरज असते. प्रेम, स्नेह व आपलेपणा तिला या संघर्षात ऊर्जादायी ठरतात. त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांची भूमिका ही ‘कॅटॅलीस्ट’सारखी आहे. समाजाचा स्वीकार आणि सकारात्मक भावना विकसित करण्यात संस्थांनी पुढाकार घ्यावा.
महिला आयोग म्हणून अभयाच्या समग्र विकासासाठी काही शिफारशींवर आमचे काम सुरु आहे. येत्या काळात या शिफारसी केंद्र सरकारकडे देऊ. तसेच ही चळवळ देशातील इतर राज्यांमध्ये घेऊन जाण्यात महिला आयोग पुढाकार घेईल,” असा शब्द विजया रहाटकर यांनी दिला.
प्रास्ताविकात मीना कुर्लेकर म्हणाल्या, “नरेंद्र मोदी सरकारचे धोरण स्त्रियांना सन्मान देणारे आहे. त्यांचे सक्षमीकरण करणारे आहे. एकल महिलांच्या प्रश्नाची गंभीरता महिला आयोगाच्या माध्यमातून केंद्र शासनापर्यंत पोहोचवावी. अभया ही चळवळ देशपातळीवर घेऊन जाण्यात विजयाताई पुढाकार घेतील, असा विश्वास वाटतो.”
एकल महिलांचे प्रश्न व सामाजिक संस्थेची जबाबदारी, तसेच कामात येणाऱ्या अडचणी समजून घेण्यासाठी परिषदेमध्ये विविध चर्चासत्रे आयोजिली होती. आर्थिक साक्षरतेवर स्वाती दुधाले, एकल महिलांचे भावनिक व मानसिक व्यवस्थापनावर डॉ. सागर पाठक यांनी मार्गदर्शन केले. शासकीय योजना व सामाजिक संस्थांना संधी याविषयीची माहिती शासकीय प्रतिनिधींनी दिली.