पुणे, दि २९- “आपल्याला जीवंत राहण्यासाठी लागणार प्राणवायू झाडे देतात. निसर्गाने दिलेली ही अमूल्य देणगी आहे. त्यामुळे झाडे लावणे व ती जपणे हा आपला धर्म आहे. प्रत्येक व्यक्तीने पर्यावरणपूरक वृक्षलागवड करणे हे केवळ सामाजिक नव्हे, तर नैतिक कर्तव्यही आहे,” असे मत केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीएफ) पोलीस उपमहानिरीक्षक वैभव निंबालकर (Deputy Inspector General of Police, Central Reserve Security Force (CRPF) Vaibhav Nimbalkar ) यांनी व्यक्त केले.
तळेगाव दाभाडे येथील केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) ग्रुप केंद्रात श्री कल्पतरू संस्थेच्या पुढाकाराने पद्मा प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाचा समारोप शनिवारी झाला. जागतिक पर्यावरण दिनापासून सुरू झालेल्या या मोहिमेअंतर्गत परिसरात सुमारे ५ हजार स्थानिक प्रजातींची रोपे लावण्यात आली असून, त्यांचे संगोपन करण्याचा संकल्पही यावेळी घेण्यात आला.
या उपक्रमात ट्रीमॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाणारे श्री कल्पतरू संस्थेचे प्रमुख विष्णू लांबा, पद्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व संस्थेचे सल्लागार शशिकांत कांबळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रवीण पाटील, सामाजिक कार्यकर्ते मिलिंद भोई, शिक्षणतज्ज्ञ डॉ. महेश थोरवे, उद्योजिका वृषाली गोसावी, मयूर पडलवार आदी मान्यवर उपस्थित होते.
संयोजक शशिकांत कांबळे यांनी सांगितले की, श्री कल्पतरू संस्थेच्या पुढाकाराने पद्मा प्रतिष्ठान, इनर व्हील क्लब आणि निर्माण ग्रीन्स यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये १०० पेक्षा अधिक स्थानिक प्रजातींची ५ हजार झाडे लावण्यात आली आहेत.
वरिष्ठ आयपीएस अधिकारी प्रवीण पाटील यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, राजस्थानमध्ये सुरू असलेल्या खाकी वॉरियर्स अभियानाप्रमाणेच पुणे पोलिस दलासोबतही अशी पर्यावरणपूरक संकल्पना हाती घेता येईल. या संदर्भात पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याशी लवकरच संस्थेचा प्रतिनिधी मंडळ भेट घेणार आहे, असे विष्णू लांबा म्हणाले.