प्रीतिसुधाजी महाराज यांच्या पावन सानिध्यात
शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन
पुणे : शाकाहार पुरस्कर्ते, सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल लिखित ‘सुखी जीवन का आधार : शाकाहार’ या शाकाहारावरील सचित्र पुस्तकाचे प्रकाशन संस्कारभारती, वाणीभूषण साध्वी प्रीतिसुधाजी महाराज साहेब यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रीतिसुधाजी महाराज यांचा ८२ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. कोथरूड येथील वर्धमान सांस्कृतिक प्रतिष्ठानमध्ये झालेल्या कार्यक्रमात साध्वी मंगलप्रभाजी महाराज आणि इतर साध्वी यांच्यासह जैन समाजातील सर्व स्थानकांचे पदाधिकारी, प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते.
डॉ. गंगवाल म्हणाले, “आज शाकाहाराचा प्रचार संपूर्ण जगात होतो आहे. सध्या पॅरिसमध्ये सुरु असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही उघडण्यात आलेली ७० टक्के हॉटेल शाकाहारी आहे. ऑलिम्पिक समितीचे प्रमुख थॉमस वॉक यांनीही कार्बन उत्सर्जन ५० टक्के कमी केले असल्याचे सांगितले आहे. आपल्या भारतात मात्र अपेक्षित गतीने शाकाहाराचा प्रचार होत नाही, ही खेदाची बाब आहे. लहान वयातच शाकाहाराविषयी मुलांना माहिती व्हावी, यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल. त्यामध्ये अनेक चित्रे, आकृत्या, कार्टून्सच्या माध्यमातून रंजकपणे शाकाहाराचा प्रसार करण्याचा प्रयत्न केला आहे.”
प्रीतिसुधाजी महाराज यांनीही आपल्या प्रवचनातून शाकाहार, अहिंसा, जीवदया याबाबत विचार व्यक्त केले. त्यांचे लोणीकंद येथील गोरक्षण, जीवदयेचे काम सर्वांसाठी आदर्शवत आहे. ४०० पेक्षा अधिक गाईंचे पालन येथे केले जात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साध्वी मंगलप्रभाजीने केले.