प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टि
पुणे: सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे सूर्यदत्त नॅशनल स्कुलमधील दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, सहयोगी उपाध्यक्षा स्नेहल नवलखा यांच्या हस्ते सुवर्णपदक, प्रमाणपत्र, सूर्यदत्तचा स्कार्फ व रोख बक्षीस देऊन गौरव करण्यात आला.
दहावीमध्ये आर्जवी पाठक ९७.४० टक्के गुण मिळवत शाळेत प्रथम आली. प्रज्ञोत राज सिंग (९५.४० टक्के) व साची गाडे (९२.६० टक्के) यांनी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक पटकवला आहे. आर्जवी पाठकने गणितामध्ये, तर साची गाडेने सामाजिक शास्त्रामध्ये १०० पैकी १०० गुण मिळवले आहेत. बारावीमध्ये हरगुन कौर मथेरू ९८.४० टक्के गुणांसह शाळेत, तसेच पुणे विभागात विज्ञान शाखेत प्रथम आली आहे. श्रीश कदम याने विज्ञान शाखेतून ९६.६० टक्के गुण मिळवले, तर ऋता काशीकर, गायत्री कुंवर, सारा हरारी या तिन्ही विद्यार्थिनींना ९५.८० टक्के गुण मिळाले. हरगुन कौर मथेरू आणि ऋता काशीकर या विद्यार्थिनींना इन्फॉर्मेटिक्स प्रॅक्टिसेस विषयात, तर आर्यन पुराणिक याला गणित विषयात १०० पैकी १०० गुण मिळाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना गौरवान्वित करण्यात आले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा आयोजिला होता. प्रसंगी संचालक प्रशांत पितालिया, मुख्याध्यापिका मारिया वर्मा, विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रशांत पितालिया यांनी प्रस्तावना केली. मारिया वर्मा यांनी आभार मानले.
सुषमा चोरडिया म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे परिश्रम, चिकाटी आणि ध्येय याचा परिणाम या निकालातून दिसून येतो. शिक्षक आणि पालकांची मिळालेली साथ, त्यांचे मार्गदर्शनही विद्यार्थ्यांना महत्वाचे ठरते. गुण महत्वाचे असले तरी अभ्यासू वृत्ती आणि परिश्रमाची तयारी यांचे महत्व या निमित्ताने अधोरेखित होते.” स्नेहल नवलखा यांनी विद्यार्थी आणि पालकांचे अभिनंदन केले.
प्रथम आलेल्या हरगुन कौर मथेरूने मनोगतात सांगितले की, ‘आयसीएसई’ परीक्षेत देशात प्रथम आल्यानंतर सूर्यदत्त नॅशनल स्कुलमध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय सार्थ ठरला. शिक्षकांचे मार्गदर्शन, व्यवस्थापनाचे वैयक्तिक लक्ष आणि पालकांकडून मिळालेले प्रोत्साहन यामुळे यश मिळविता आले. अभ्यासातील सातत्य आणि आलेल्या समस्यांवर केलेली मात यामुळे यशात सातत्य राखता आले.”
————————
“सूर्यदत्त विद्यार्थी, स्टाफसाठी प्रोत्साहनात्मक वातावरण निर्माण करते. सर्वांगीण शिक्षण आणि सर्वांसाठी शिक्षण या ध्येयाने प्रेरित होऊन संस्थेचे काम सुरु आहे. कल्पकता, नवनिर्माण आणि नवीन ते शिकणे यावर भर दिला जात आहे. नवीनतेचा ध्यास, ते प्रत्यक्ष उतरविण्याकरिता परिश्रमाची जोड हवी. बारावीनंतरचा मार्ग निवडताना संधींचा कल जाणून घेऊन मार्ग निवडावा आणि दहावीनंतरच्या विद्यार्थी, पालकांनी नवीन शिक्षण धोरण समजून घ्यावे.”
– प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, संस्थापक व अध्यक्ष, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन