पुणे जिल्हा देशात व्दितीय क्रमांकावर- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे जिल्हा देशात व्दितीय क्रमांकावर- मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील

पुणे, दि. २१: महिला व बाल विकास विभागांतर्गत राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवाडयातील जनजागृती उपक्रमामध्ये पुणे जिल्ह्याने देशात द्वित्तीय क्रमांक पटकावला आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली आहे.

केंद्र शासनाच्या सुचनेनुसार ९ एप्रिल २०२६ पासून जिल्ह्यात सर्व अंगणवाडी केंद्रामधे हे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पंधरवाडयात आतापर्यंत २ लाख ८८ हजार ४३४ उपक्रम राबविण्यात आले आहे. याच पार्श्वभुमीवर जिल्ह्याने देशात व्दितीय क्रमांक पटकावला आहे. अहिल्यानगर जिल्हा प्रथम तर बिहार राज्यातील मुझफ्फरपुर जिल्ह्याने तिसऱ्या क्रमांक पटकाविला आहे.

या पंधरवाडयाचे राष्ट्रीय स्तरावरील उद्घाटन केंद्रीय महिला व बाल विकास मंत्री अन्नपुर्णादेवी यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले होते. जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. बालकाच्या आयुष्यातील पहिली सहा वर्ष पोषण व शिक्षणासाठी अत्यंत महत्वाची असतात. याच अनुषंगाने ‘बालकांच्या जीवनातील पहिल्या ६ वर्षातील मेंदूचा विकास’ या मुख्य संकल्पनेवर यंदाचा पंधरवडा केंद्रित आहे. यामधे माता व बालकांचे पोषण, शुन्य ते तीन वर्ष वयोगटातील बालकांच्या मेंदुच्या विकासाकरीता पुर्व उद्दीपन, तीन ते सहा वर्ष वयोगटातील मुलांसाठी खेळ आधारीत पूर्व शालेय शिक्षण, बालकांचा स्क्रिनवरील वेळ कमी करण्यासाठी पालकांची भुमिका व अंगणवाडी केंद्र सक्षम करण्यासाठी समुदायाचा सहभाग वाढविणे या प्रमुख विषयांवर भर दिला जात आहे.

गाव पातळीवर विविध उपक्रम जिल्ह्या परिषदेच्यावतीने गाव पातळीवर आरोग्य, शालेय शिक्षण, ग्रामविकास व इतर संबंधित विभागाच्या समन्वयाने हे अभियान राबविले जात आहे. ग्रामपंचायत व अंगणवाडी स्तरावर मशाल फेरी, पाककृती स्पर्धा, पोषण रॅली, माता बालक आरोग्य मार्गदर्शन शिबीरे, आहार प्रात्यक्षिके, गृहभेटी तसेच पालक बैठकीचे आयोजन करण्यात येत आहे. यामधे महिला, पालक व स्थानिक नागरिक उस्फुर्तपणे सहभागी होत आहेत. बालकांच्या सर्वांगिण विकासासाठी नागरिकांनी या उपक्रमामधे सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. पाटील यांनी केले.

या उपक्रमामध्ये अंगणवाडीस्तरावर झालेल्या उत्कृष्ट कामाबाबत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसेपाटील तसेच महिला व बाल कल्याण सभापती अंकिता पाटील यांनी सर्व यंत्रणांचे कौतुक केले आहे, अशी माहिती जिल्हा कार्यक्रम अधिकारी आनंद खंडागळे यांनी दिली आहे.