स्वर्गीय प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगा लॉज मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ४० वे कवी संमेलन व यशवंतराव चव्हाण कला साहित्य पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. या समारंभात ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते महेश कोठारे यांना ‘यशवंतराव चव्हाण कला जीवनगौरव पुरस्कार’, तर रानमाणूस प्रसाद गावडे यांना ‘अजितदादा सामाजिक कार्य पुरस्कार’ प्रदान करण्यात आले. प्रत्येकी ५१ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे या पुरस्कारांचे स्वरूप होते. या दोन पुरस्कारांसह ‘यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार’ बुलढाणा येथील प्रेषित प्रदीप सिद्धभट्टी (काव्यसंग्रह-विस्मरणाच्या आरण्यात), चंद्रपूर येथील अविनाश पोईनकर (दंडकारूण्य) व नाशिक येथील प्रतिभा पवार-खैरनार (कवितासंग्रह – वंशावळीच्या प्राचीन सरीतून) यांना प्रदान करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप प्रत्येकी रोख ११,००१ व सन्मानचिन्ह असे होते.
टिळक स्मारक मंदिरात पार पडलेल्या या सोहळ्यावेळी ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर, नीलिमा कोठारे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष सुनील टिंगरे, संयोजक व प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्टचे विजय ढेरे, संजय ढेरे, ट्रस्टचे गौरव फुटाणे, मित्र मंडळाचे सचिन जाधव, कुणाल जाधव, नगरसेवक व माजी महापौर दत्तात्रेय धनकवडे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.
प्रसाद गावडे म्हणाले, कोकणातील नंदनवन असणाऱ्या गावांत राहून तिथेच काम करतो. निसर्गाशी, पर्यावरणाशी जुळवून घेत जगणारी माणसे आजही कोकणात आहेत. पर्यावरणस्नेही जगणे आणि शाश्वतता त्यांनी अबाधित राखली आहे. त्यांचे समृद्ध जगणे आजच्या तथाकथित विकासप्रक्रियेचे फलित नाही, हे आवर्जून सांगायला हवे. अजितदादा पवार यांच्या नावाचा हा पुरस्कार माझ्यासाठी आनंददायी आहे. कारण जल, जमिनीविषयी आस्था बाळगणारे ते नेते होते.
प्रास्ताविकात ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे म्हणाले, कवींनी सर्वसामान्यांचे जगणे, समस्या, दुःख यांचे प्रतिनिधित्व करावे. त्यांचे प्रश्नही कवितेतून मांडावेत, यासाठीच या उपक्रमाचे स्वरूप कवीसंमेलन, असे ठेवले आहे. गेली ४० वर्षे ते जपले आहे. तशीच श्रोत्यांनीही रसिकता जपली आहे. अंजली कुलकर्णी यांनी साहित्य पुरस्कारप्राप्त कवींचा परिचय करून दिला. राजेश्वरी थोरवे यांनी सूत्रसंचालन केले. विजय ढेरे यांनी सर्वांचे आभार मानले.
——————————
काव्यमैफलीने रसिकांना मोहिनी
‘रिकामं सिलेंडर म्हणालं, नको तेव्हा पेटत होतो, आता सारं संपलं आहे, तैलबुद्धी लोकांचं, आखातात जुंपलं आहे’ या रामदास फुटाणे यांच्या सद्यस्थितीवरील काव्याने मैफलीची सुरुवात झाली. स्त्री शोषणावरील भाष्य करणारी मधुरा उमरीकर यांची ‘काल चार कविता नदीवर आल्या होत्या काळीज धुवायला’, स्त्रीला दुय्यम लेखणाऱ्या समाजाला फटकारणारी गुंजन पाटील यांची ‘मी लक्ष्मण रेष ओलांडून आली, मी अजिबात रावणाला घाबरत नाही’, आदिवासी भागाचे वास्तव मांडणारी अविनाश पोईनकर यांची ‘आमचे स्वातंत्र्य आमच्यापर्यंत पोहोचलेच नाही’, धार्मिक परिस्थितीवर भाष्य करणारी यामिनी दळवी यांची ‘धर्माच्या दावणीला’, दुष्काळाचे वास्तव सांगणारी प्रशांत मोरे यांची ‘कोरड्या हौदा पाशी माझा ज्योतिबा गं उभा’, शेतीची कहाणी सांगणारी कल्पना दुधाळ यांची ‘काहीच पिकलं नाही तेव्हा अनुभव पिकला’, परिस्थितीची जाणीव नसलेल्या मुलाचे जगणे सांगणारी भारत दौंडकर यांची ‘मुलगा पुस्तक वाचत होता’ या आणि अशा आशयघन काव्यरचनांनी पुणेकर रसिकांना मोहिनी घातली. प्रसंगी खळखळून हसवले, तर काही शब्दांनी डोळ्यात पाणीही आणले. अशोक नायगावकर यांनी ‘उजवा डावा’ या कवितेतून समाजकारण आणि राजकारण यातली विषन्नता विनोदी शैलीतून सादर केली. महेश केळुस्कर व शशिकांत तिरोडकर यांनी मालवणीत रचना सादर केली. अनिल दीक्षित यांनी पुणेरी शैलीत पुण्याची महती आपल्या काव्यातून मांडली. ‘एक बातमी दडपण्यासाठी, नवी बातमी घडवत असतात, एफस्टीनचा ब्लॅक बॉक्स, आयुष्यभर दडवत असतात’ या वात्रटिकेतून सध्या चर्चेत असलेल्या मुद्द्यावर रामदास फुटाणे यांनी मिश्किल भाष्य केले. ‘तुझ्या आतल्या अस्वस्थतेचा, डोंगर पोखरू नकोस बये’ या कवितेतून प्रतिभा खैरनार यांनी स्त्रीचे जगणे उलगडले.
