शिवाजी रस्त्यावरील मामलेदार कचेरीसमोर रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात गोंधळी, संयोजक शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठ्ये, लोक जनशक्ती पार्टीचे संजय आल्हाट, भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड, कविता डाडर, प्रभा अवलेलू, सोनाली ओव्हाळ, रेखा वाघमारे, चित्रा साळवे, मुकुंद गायकवाड, राहुल गायकवाड, सुरेश फाले, रेश्मा जांभळे, शारदा लडकत, डॉ. योगेश कदम, विमल सोंडे, अनिता चिंचोलीकर, मंदार देसाई, विनोद बाफना, साईराज जांभळे, रजनी पाचंगे, मंगल रासगे आदी उपस्थित होते. संबळ वाजवणारे गोंधळी, तहसीलदारांच्या नावानं चांगभलं, गरीब रुग्णाला न्याय दे देवा असं साकडं जागरण गोंधळ आंदोलनात घालण्यात आले.
उमेश चव्हाण (umesh chavan) म्हणाले, “रुग्णांचे डिस्चार्ज झाले, तरी उत्पन्नाचे दाखले न देणाऱ्या, निद्रिस्त हवेली आणि पुणे शहर तहसीलदारांना झोपेतून जागे करण्यासाठी हे धार्मिक स्वरूपाचे जागरण गोंधळ आंदोलन आहे. गेल्या एक महिन्यांपासून उत्पन्नाचे दाखले देण्यात वेळखाऊ धोरण सुरु आहे. त्यामुळे मोफत आरोग्य योजनेचा लाभ घेता येत नाही. खाजगी ई-सेवा केंद्रात मनमानी पद्धतीने पैसे घेऊनही दाखला मिळायला २०-२५ दिवस लागतात. विद्यार्थ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. घरेदारे विकून, सोनेचांदी गहाण ठेवून, कर्ज काढून रुग्ण व विद्यार्थी वेळ भागवून नेतात. मात्र, योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले दाखले मिळत नाहीत. त्यामुळे त्यांची घरे उद्ध्वस्त होत आहेत. हे टाळण्यासाठी उत्पन्नाचे दाखले वेळेत द्यावेत, ही मागणी या आंदोलनाद्वारे आम्ही करत आहोत.”