सकारात्मक ऊर्जा, सर्वांगीण शिक्षणाला ‘सूर्यदत्त’चे प्राधान्य
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांचे मत; सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे बारावीतील गुणवंतांचा सत्कार
पुणे : “आजच्या पिढीमध्ये बुद्ध्यांक (इंटेलिजन्स कोशंट-आयक्यू) पातळी चांगली आहे. परंतु, त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा, भावनांक (इमोशनल कोशंट-ईक्यू) अभाव दिसून येतो. ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळाले, तरी नैराश्यात जाणाऱ्या विद्यार्थी आपल्याला दिसतात. हे बदलण्यासाठी प्रतिकूल परिस्थितीतही संयम, मनशक्ती वाढविण्याची गरज असून, त्यासाठी मनाची शक्ती वाढण्याचे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे, ” असे प्रतिपादन प्रेरक वक्ते व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे माईंड ट्रेनर बी. के. शक्तीराज यांनी केले.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सतर्फे ३५० वा शिवराज्याभिषेक व सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेज व सूर्यदत्त पब्लिक स्कुलमधील १२ वी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात बी. के. शक्ती राज यांना ‘सूर्यभूषण राष्ट्रीय पुरस्कार २०२३’ प्रदान करण्यात आला. प्रसंगी प्रजापिता ब्रह्माकुमारीच्या सरिताबेन राठी, सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया, संचालक प्रा. प्रशांत पितालिया, सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या वंदना पांडे, सूर्यदत्त पब्लिक स्कुलच्या प्राचार्या किरण राव आदी उपस्थित होते.
सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमधील विज्ञान शाखेत स्वराली किरण कुलकर्णी, अर्पित मकरंद विभुते, सिद्धा संदीप गुहा, वाणिज्य शाखेत आयुषी उपेंद्र परदेशी, सानिका निशांत देशपांडे, आर्या अभिजित महाजन, कला शाखेत शांभवी आनंद तेंबुलकर, भूमी सागर साबू, मधुरा अभय अंभोरकर, एमसीव्हीसी शाखेत श्रावणी गोविंद मोदी, चिन्मय आनंद पाटील, यशोधन राजेश खुळे यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला. सूर्यदत्त पब्लिक स्कुलमधील वाणिज्य गार्गी मनीष मोघे, उर्वी सुमित गुर्जर, झोया अजय जव्हेरी, वाणिज्य शाखेत अंजली भूपेंद्र टाक, आशेषा चितवन हुमाद, सोहम सचिन देशपांडे व साई मिलिंद सिनकर, कला शाखेत सावित्री कन्नन, विधी संजय भारांबे, अनन्या राहुल चौधरी यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकवला. या सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना सुवर्णपदक, प्रमाणपत्र व रोख बक्षीस देऊन पाहुण्यांच्या हस्ते गौरविण्यात आले. मुलांसमवेत आलेल्या आई-वडील, आजी-आजोबा यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
बी. के. शक्ती राज म्हणाले, “आनंदाचा पासवर्ड आपल्याला माहिती असायला हवा. मंगळावर जीवन शोधत असताना आपले आयुष्य दंगलमय होऊ नये, याची काळजी घ्यायला हवी. मनातील नकारात्मक विचार, भाव काढून टाकता आले पाहिजेत. वाईट विचारांपासून दूर राहायला हवे. स्वराज्याच्या निर्मितीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे योगदान दिले, त्या पदधातूने त्यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आजच्या तरुणाईने राष्ट्र उभारणीच्या कामात योगदान द्यावे.”
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “सूर्यदत्त संस्थेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना, स्टाफला सकारात्मक वातावरण आहे. विद्यार्थ्यांच्या मनाची चांगली मशागत करून त्यांना सर्वांगीण विकासाचे, जागतिक दर्जाचे गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यावर आमचा भर आहे. नकारात्मक गोष्टींना दूर सारून सूर्यदत्त परिवार चांगल्या गोष्टी कायम प्रोत्साहित करते. आपापल्या संवादात, वागण्यात सतत चांगले आणि सकारात्मक विचार अमलात आणायला हवेत. विद्यार्थी, पालकांनी नवीन शिक्षण धोरण समजून घेत नव्या दिशा, संधीचा लाभ घ्यावा.”
“एकत्र कुटुंब पद्धती मुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी, तसेच त्यांची गुणवत्ता वाढून देशाचा चांगला नागरिक घडण्यासाठी उपयुक्त ठरते. भारतीय संस्कृतीचा आधार असलेल्या एकत्र कुटुंबाला प्रोत्साहन दिले पाहिजे. या मुलांच्या यशात शिक्षकांसह आई-वडील, आजी-आजोबा यांचे योगदान आहे. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहत असलेल्या मुलांचा सहभाग या गुणवान विद्यार्थ्यांमध्ये अधिक दिसतो. त्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी घरात चांगले वातावरण गरजेचे असून, एकत्र कुटुंब पद्धती ही आजच्या काळाची गरज आहे,” असेही प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी नमूद केले.
सरिताबेन राठी यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. प्रा. सायली देशपांडे व प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले. सुषमा चोरडिया यांनी आभार मानले.