व्यवस्थापन पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे राष्ट्रनिर्माते व्हावे –  राज्यपाल संतोष कुमार गंगवार

व्यवस्थापन पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ आणि ‘आत्मनिर्भर भारता’चे राष्ट्रनिर्माते व्हावे – राज्यपाल संतोष कुमार गंगवार

 ‘पीआयबीएम’चा १५वा दीक्षांत समारंभ उत्साहात
पुणे, दि. २९- “व्यवस्थापनाचे शिक्षण घेतलेल्या पदवीधरांनी ‘कर्तव्यनिष्ठ नागरिक’ म्हणून आपली भूमिका स्वीकारण्याचे आणि ‘आत्मनिर्भर भारता’च्या दृष्टिकोनासाठी राष्ट्रनिर्माणात सक्रिय योगदान द्यावे. त्यांच्या पदवीचे खरे मूल्य केवळ वैयक्तिक यशामध्ये नाही, तर इतरांप्रती संवेदनशीलता बाळगण्यात आणि कठीण प्रसंगी इतरांना मदत करण्याच्या इच्छेमध्ये आहे,” असे प्रतिपादन झारखंडचे राज्यपाल संतोष कुमार गंगवार  (Jharkhand Governor Santosh Kumar Gangwar ) यांनी केले. रमनप्रीत यांच्या नेतृत्वात ‘पीआयबीएम’ने आदर्श पिढी निर्माण करण्याचे हाती घेतलेले काम स्तुत्य असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले. 
 
पुणे इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचा (पीआयबीएम) २०२२-२४ या शैक्षणिक वर्षाचा १५ वा दीक्षांत समारंभ शुक्रवारी राज्यपाल गंगवार यांच्या उपस्थितीत पार पडला.        (The 15th convocation ceremony of the Pune Institute of Business Management (PIBM) for the academic year 2022-24 was held on Friday in the presence of Governor Gangwar.  ) पिरंगुट येथील ‘पीआयबीएम’च्या कॅम्पसमध्ये आयोजित समारंभासाठी राष्ट्रीय महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा व राज्यसभा खासदार रेखा शर्मा, टाटा ऑटोकॉम्प सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष अरविंद गोयल, रिलायन्स जिओमार्टचे सीईओ संदीप वर्गीती, टाटा मोटर्स फायनान्सचे व्यवस्थापकीय संचालक नीरज धवन, ‘पीआयबीएम’चे संस्थापक अध्यक्ष रमनप्रीत        (Ramanpreet, Founder President of PIBM )   यांच्यासह विविध क्षेत्रांतील नामवंत पाहुण्यांची विशेष उपस्थिती होती. दुपारच्या सत्रात ज्येष्ठ विधिज्ञ ऍड. एस. के. जैन, टाटा प्रोजेक्ट्सचे व्यवस्थापकीय संचालक विनायक पै, स्टेट स्ट्रीटचे कार्यकारी उपाध्यक्ष अरिंदम बॅनर्जी, माजी केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री सुभाष सरकार, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. तसेच त्यांचे मार्गदर्शनपर भाषणे झाली. एमबीए आणि पीजीडीएम विद्यार्थ्यांना त्यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. नवपदवीधरांच्या स्वप्नांना पंख देणारा आणि नव्या प्रवासाला सुरुवात करणारा हा सोहळा अविस्मरणीय ठरला.
 
संतोष कुमार गंगवार म्हणाले, “विद्यार्थ्यांनी स्पष्ट विचार करून असे निर्णय घ्यावेत, ज्यामुळे इतरांवर सकारात्मक प्रभाव पडेल. विद्यार्थ्यांचे वैयक्तिक सामर्थ्य राष्ट्राचे भविष्य घडवणारे आहे. ‘पीआयबीएम’च्या मजबूत कॉर्पोरेट संबंधांचे कौतुक वाटत असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारता’चे स्वप्न साकार होण्यासाठी हे प्रयत्न उपयुक्त थरातील. केवळ वैयक्तिक यशावर लक्ष केंद्रित न करता, राष्ट्राच्या भविष्याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा.”

रमनप्रीत यांनी मान्यवर आणि पदवीधर विद्यार्थ्यांचे स्वागत केले. २००७ मध्ये स्थापनेपासूनच्या ‘पीआयबीएम’च्या प्रवासावर त्यांनी प्रकाश टाकत, शैक्षणिक आणि कॉर्पोरेट जगतातील अंतर कमी करून भविष्यातील सक्षम नेते घडवण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. लवकरच पीआयबीएम ‘डिजिटल युनिव्हर्सिटी’ म्हणून विकसित होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा करत संस्थेला जागतिक दर्जाची युनिव्हर्सिटी बनवण्यासाठी अथक परिश्रम करत असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांना ‘मोठे विचार करून मोठे यश मिळवा’ असा सल्लाही त्यांनी दिला, तसेच केवळ ‘तीन टक्के विद्यार्थी’ जे दूरदृष्टी बाळगतात आणि इतरांना मार्गदर्शन करतात, त्यांच्यापैकी एक होण्याचे आवाहन केले. धोका पत्करण्याची क्षमता आणि आपल्या कम्फर्ट झोन मधून बाहेर पडणे यशाची गुरुकिल्ली असल्याचे सांगून, त्यांनी पदवीधरांना शुभेच्छा दिल्या.

अरविंद गोयल यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक जीवनात नैतिक मूल्यांना केंद्रस्थानी ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या (एआय) परिवर्तनकारी क्षमतेवर विशेष भर दिला. ‘एआय’मध्ये असलेल्या संधींचा फायदा घेणे हे आपले काम आहे. ‘एआय’मुळे कामाच्या पद्धतीत मोठे बदल होतील, परंतु ते नोकरीच्या संधी कमी करणार नाही, उलट कामाच्या प्रक्रियेत डिजिटायझेशन अधिक समाविष्ट करेल, असे गोयल यांनी सांगितले. ‘रोबोडॉक्टर्स’ आणि ‘रोबोलॉयर्स’ यांसारखी उदाहरणे देत त्यांनी संभाव्य फायदे अधोरेखित केले आणि सतत शिकण्याची व नवीन ट्रेंडशी जुळवून घेण्याची गरज ही खऱ्या नेतृत्वाची ओळख असल्याचे सांगितले.

रेखा शर्मा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विद्यार्थी सक्षमीकरणाच्या विविध उपक्रमांची प्रशंसा केली. त्यांनी वेळेचे व्यवस्थापन आणि कार्य-जीवन संतुलन राखण्याचे महत्त्व अधोरेखित केले, तसेच विद्यार्थ्यांना आपल्या कुटुंबासाठीही वेळ देण्याचा सल्ला दिला. अपयशाला सामोरे जाताना दृढनिश्चय राखण्याचे आवाहन करत, त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ नोकरी शोधणारे न बनता, नोकरी निर्माण करणारे बनण्याचे ‘मोठे स्वप्न’ पाहण्यास प्रोत्साहित केले, जे सरकारच्या स्टार्टअप धोरणांशी सुसंगत आहे. त्यांनी ‘मिशन कर्मयोगी’ चा उल्लेखही नागरिक सेवेसाठी एक मार्ग म्हणून केला. 

एआयच्या क्रांतीकारक स्वरूपाची कबुली देत, त्यांनी त्याचा  वापर संशोधनासाठी वैयक्तिकरित्या करत असल्याचे सांगितले आणि मानवकेंद्रित नेतृत्वाची गरज व्यक्त केली. शर्मा यांनी व्यवस्थापन आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांची वाढती भूमिका अधोरेखित केली, तसेच चारित्र्य हे एक महत्त्वाचे वैयक्तिक गुण असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांना ‘आत्मनिर्भर भारता’ च्या दृष्टिकोनात योगदान देण्याचे आवाहन केले.

 
या विद्यार्थ्यांना मिळाले सुवर्णपदक
‘एमबीए’मध्ये साक्षी पाठक, पुरबिता भट्टाचार्य, हृतिक साखरकर यांना, तर पीजीडीएममध्ये श्रीजा मुन्शी, सुरभी सिंग, दीपिका अय्यर यांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला. एमबीए फायनान्सची आकांक्षा येवले, एमबीए मार्केटिंग साक्षी पाठक, एमबीए एचआर मानसी अमृतकर, एमबीए फिनटेक रोशन भगत, एमबीए प्रोजेक्ट मॅनेजमेंट मिंशु सिंग, पीजीडीएम फायनान्स रीतिशा खुदानिया, पीजीडीएम मार्केटिंग श्रीजा मुन्सी, पीजीडीएम एचआर दीपिका अय्यर, पीजीडीएम बिझनेस अनॅलिटीक्समध्ये पौलमी चक्रवर्ती, अमितवा रॉय यांना सुवर्णपदक मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *