शशिकांत कांबळे यांचे मत; महात्मा गांधी महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
पुणे : “संविधान हा आपला आत्मा असून, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समिती सदैव त्याच्या रक्षणासाठी तत्पर आहे. कोलंबीया विद्यापीठातील कुलगुरूंच्या कार्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो आहे. त्याखाली ‘आम्हाला अभिमान आहे की, आमच्या काॅलेजमधे शिकलेला आमचा विद्यार्थी एका देशाच्या संविधानाचा शिल्पकार ठरला’ असे लिहिले आहे. नेल्सन मंडेला यांनी देखील ‘भारताकडून घेण्यासारखी एकच गोष्ट असून, ती म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले संविधान’ अशा शब्दात संविधानाचा गौरव केला आहे. अशा संविधानाचे रक्षण करणे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे,”
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संघर्ष समितीच्या वतीने खानापूर येथील महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून संतोष शिंदे बोलत होते. प्रसंगी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत कांबळे, इतिहास तज्ञ दत्ताजी नलावडे, जिल्हा परिषदचे माजी सदस्य नवनाथ पारगे, सरपंच शरद जावळकर, महेश धिवार, हर्षल दौंडकर, मुख्याध्यापक शशिकांत यादव आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
“समाजातील अस्पृश्यता नाहीशी करून सामान्य माणसाला सन्मानाने जगण्याचा अधिकार भारतीय संविधानाने दिला. त्या संविधानाला अबाधित ठेवण्याचे दायित्व आपल्या प्रत्येकावर आहे. काही लोक संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. मात्र, संविधान हे सर्वोच्च असून, त्याचा सन्मान राखायला हवा. संविधानाशी तडजोड करण्याचा प्रयत्न आपण हाणून पाडला पाहिजे,” असे मत संभाजी ब्रिगेडचे राज्य संघटक संतोष शिंदे यांनी व्यक्त केले.
यावेळी संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन आंबेडकर समितीचे पुणे जिल्हा अध्यक्ष संघदीप शेलार यांनी केले.