कनेक्टिंग ट्रस्टच्या वतीने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना भावनिक आधारासाठी मोफत हेल्पलाईन
पुणे, दि. १६ – दहावी व बारावीचा टप्पा करिअरच्या दृष्टीने महत्वाचा असला, तरी या परीक्षांमधील निकाल सर्वस्वी नसतो. त्यामुळे दहावी-बारावीच्या परीक्षेत अपयश आले किंवा कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांनी निराश होऊ नये. आपला आत्मविश्वास न गमावता मोकळेपणाने बोलून अन्य पर्यायांची माहिती करून घ्यावी, असे आवाहन आत्महत्या प्रतिबंधासाठी कार्यरत कनेक्टिंग ट्रस्ट संस्थेच्या वतीने करण्यात आले. कनेक्टिंग ट्रस्टतर्फे (containing trust) विद्यार्थ्यांशी बोलण्यासाठी निःशुल्क भावनिक आधार सुविधा आठवड्याचे सातही दिवस उपलब्ध आहे. सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत या वेळेत ९९२२००४३०५ आणि ९९२२००११२२ या हेल्पलाइनवर विद्यार्थ्यांना आपल्या भावना व्यक्त करता येतील. लिखाणाच्या माध्यमातून व्यक्त होऊ इच्छिणाऱ्यांनी distressmailsconnecting@gmail. com यावर त्यांची समस्या लिहून पाठवता येईल, असे प्रकल्प समन्वयक विक्रमसिंह पवार यांनी नमूद केले.
विक्रमसिंह पवार (vikramshinh pawar)म्हणाले, “नुकतेच इयत्ता १०वी आणि १२वीचे बोर्डाचे निकाल जाहीर झाले. अनेकांना चांगले गुण मिळाले, तर काहींना कमी मिळाले. काहींच्या पदरी निराशा आली. घरच्यांकडून, समवयस्कांकडून आणि बऱ्याचदा स्वतःकडूनही अनावधानाने होणारी इतरांशी तुलना यामुळे बहुतांश विद्यार्थी आणि तरुणांचा आत्मविश्वास कमी होतो. जीवनात आपण कधीच यशस्वी होऊ शकणार नाही का? या प्रश्नासह न्यूनगंडाची भावना बळावते आणि त्याचे रूपांतर निराशेत होऊन जीवन नकोसे वाटू लागते. विद्यार्थी टोकाची भूमिका घेतात. अशावेळी त्यांना भावनिक ताणतणावात संवेदनशीलपणे ऐकून घेणारा आधार मिळाला, तर चुकीच्या घटना थांबवणे शक्य होते. कनेक्टिंग ट्रस्ट भावनिक आधारासाठी हेल्पलाईन चालवते. कोणत्याही प्रकारे निष्कर्ष न काढता, सल्ला न देता ऐकून घेऊन मानसिक आधार देते. ४७ प्रशिक्षित स्वयंसेवक ही हेल्पलाईन चालवतात.”
गेल्या काही वर्षात भारतात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या संख्येत विलक्षण वाढ झाल्याचे दिसते. काही विश्वासार्ह अहवालांच्या मते हा आकडा शेतकऱ्यांच्या आत्महत्यांपेक्षाही जास्त आहे. नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या (National crime record buro) अहवालानुसार २०२२ मध्ये भारतात १३,०४४ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या नोंदवल्या. हा आकडा चिंताजनक आहे. या परिस्थितीला तोंड द्यायला केवळ जनजागृती पुरेशी नाही. विद्यार्थ्यांसाठी संवेदनशील भावनिक आधार प्रणाली असणे गरजेचे आहे. जिथे ते त्यांच्या समस्यांविषयी आणि भावनांविषयी निःसंकोचपणे बोलू शकतील. मानसिक आरोग्याविषयी समाजात असलेली दुय्यम आणि कलंकित भावना ह्यामुळेदेखील विद्यार्थी गरज असून सुद्धा आधार मागायला संकोचतात. अशावेळी, विद्यार्थ्यांना साथ देण्यासाठी, त्यांचे दुःख ऐकून घेण्यासाठी कनेक्टिंग ट्रस्ट ही संस्था त्यांच्या बरोबर खंबीर उभी आहे,” असे पवार यांनी नमूद केले.