पुणे: “स्वातंत्र्यानंतरही गोंधळी व भटक्या-विमुक्त समाजाला मुख्य प्रवाहात येण्यासाठी झगडावे लागत आहे. गावोगाव भटकंती करून गुजराण करणाऱ्या, पालांवर, वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्यासाठी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक स्थैर्य मिळायला हवे. त्यातूनच या समाजाच्या अडचणी दूर होऊन पुढील पिढ्या घडतील,” असे मत भटके विमुक्त विकास परिषद व प्रतिष्ठानचे अध्यक्ष उद्धव काळे यांनी व्यक्त केले.

गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती विकास संघ आणि अखिल भारतीय गोंधळी समाज संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्नेहमेळावा व वधू-वर परिचय संमेलनात उद्धव काळे बोलत होते. गोंधळी समाजातील पहिले महापौर झाल्याबद्दल इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. कवड्याची माळ, शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह असे सत्काराचे स्वरूप होते. स्नेहमेळाव्याला १५०० समाजबांधवांनी, तर वधू-वर परिचय संमेलनात ३५० मुलामुलींनी सहभाग नोंदवला.
म्हात्रे पुलाजवळील शुभारंभ लॉन्स येथे आयोजित या स्नेहमेळाव्याला भारतीय जनता पार्टीचे प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर, नगरसेवक सुरज लोखंडे, दीपक नागपुरे, तहसीलदार संजय भोसले, गोंधळी व भटक्या विमुक्त जाती-जमाती संघाचे अध्यक्ष परेश गरुड, अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अध्यक्ष राजेंद्र वनारसे, सदस्या रजनी पाचंगे, मुकुंद यदमळ, हरीष पाचंगे आदी उपस्थित होते. गोंधळ व संबळ वादन सादरीकरणाने स्नेहमेळाव्याची सुरुवात झाली.
उद्धव काळे म्हणाले, “आपल्या समाजाचे सांस्कृतिक महत्त्व अनन्यसाधारण आहे. आपल्या समाजाच्या उत्थानासाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांचा लाभ आपल्या समाजातील अनेक घटकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. माहितीचा अभाव, प्रशासकीय अडचणी आणि मार्गदर्शनाची कमतरता यामुळे अनेक पात्र लाभार्थी वंचित राहतात. त्यामुळे केवळ योजना जाहीर न करता त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल, यासाठी विशेष लक्ष द्यायला हवे.”
उदय धातुंडे म्हणाले, “समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शासन, सामाजिक संस्था आणि समाजबांधव यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. तेव्हाच आपल्या समाजाला खऱ्या अर्थाने न्याय आणि समान संधी मिळू शकतील. आजचा मेळावा समाजाला एकत्र आणणारा आणि नातेसंबंध दृढ करणारा उपक्रम आहे. यातून अनेक कुटुंबे एकमेकांच्या संपर्कात येतात. अनेक विवाह जुळून येतात, ही अत्यंत आनंददायी आणि सकारात्मक बाब आहे.”
संदीप खर्डेकर म्हणाले, “महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख ही केवळ इतिहासात मर्यादित नसून, ती आजही आपल्या दैनंदिन जीवनात जिवंत आहे. आजही ग्रामीण भागात पहाट वासुदेवाच्या गजरानेच उजाडते, आणि याच परंपरेतून गोंधळी तसेच भटक्या-विमुक्त जाती-जमातींचे आपल्या समाजजीवनातील अनन्यसाधारण स्थान स्पष्ट होते. हे समाजघटक केवळ सांस्कृतिक वारसा जपणारे नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या अस्मितेचे जिवंत प्रतीक आहेत.”
परेश गरुड यांनी प्रास्ताविकात समाजाच्या हितासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांविषयी माहिती दिली. तसेच लवकरच समाजभवन उभारण्यात येणार असून, व्यापक कार्य त्या माध्यमातून उभे राहणार असल्याचे सांगितले. सुरज लोखंडे, राजेंद्र वनारसे यांनीही मनोगते व्यक्त केली. मुकुंद यमगळ यांनी सूत्रसंचालन केले. रमेश उबाळे आणि चंदन अटक यांनी आभार मानले. शिरीष खडके यांनी स्वागत केले.
—————————-
गोपीनाथ मुंडे यांचे स्मरण
माजी केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या कार्यकाळात गोंधळी आणि भटक्या-विमुक्त समाजासाठी केलेले काम महत्वाचे होते. त्यांनी याकडे केवळ राजकीय विषय म्हणून न पाहता, सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून निर्णय घेतले. समाजाच्या अनेक मूलभूत मागण्या शासनाकडे प्रलंबित आहेत. शिक्षण, रोजगार, निवास, आरक्षण, तसेच सांस्कृतिक ओळखीचे संवर्धन या सर्व क्षेत्रांत ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या मागण्या केवळ कागदोपत्री न राहता, त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे ही काळाची गरज आहे. यासाठी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्याशी बैठक घेऊन लवकरात निर्णय घेऊ, असे आश्वासन खर्डेकर यांनी दिले. तसेच समाजातील गरजू लोकांचे मोतीबिंदू व काचबिंदू शस्त्रक्रिया मोफत करणार असल्याचे खर्डेकर यांनी घोषित केले.
