देशात शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : इंद्रेश कुमार

देशात शांतता व सामाजिक सलोख्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे : इंद्रेश कुमार

पुणे : “समाजात शांतता नांदणे, सलोख्याचे वातावरण राहणे आवश्यक आहे. त्यासाठी आपणच सतर्क राहायला हवे. समाजाने समाजाचे तुकडे होण्यापासून वाचवावे. समाजात फूट पडणाऱ्या शक्तींना दूर ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. शांतता आणि सामाजिक सलोखा राखण्यात आपल्या प्रत्येकाचे योगदान महत्वाचे आहे,” असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेचे वरिष्ठ केंद्रीय समिती प्रचारक इंद्रेश कुमार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना व्यक्त केले. प्रसंगी भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अली दारूवाला उपस्थित होते.

इंद्रेश कुमार म्हणाले, “समाजात दोन प्रकारच्या विचारधारांचे लोक राहतात. एक ज्यांना एकता व बंधुभावाने चालावे असे वाटते. तर दुसरे म्हणजे एकोपा नको, सद्भाव नको अशा विचारांचे लोक असतात. त्यासाठी विविध मार्ग शोधून भांडणे काढत असतात. अशा लोकांवर मत करण्यासाठी एकटा हवी असणाऱ्या लोकांनीच सद्भावना वाढविण्यासाठी पुढे येणे आवश्यक आहे. आपल्या देशात विविधता असली तरी त्यातील एकता हे आपले वैशिष्ट्ये आहे. ही एकता टिकवून ठेवण्याची जबाबदारी आपली आहे. आपण एकमेकांच्या जातीचा, धर्माचा आदर केला पाहिजे. त्यामुळे कोणाच्याही सणांवर आक्रमण करणे हे अतिशय चुकीचे व निंदनीय आहे.”

“आपल्याला या देशात अपराधींना धर्माच्या नावावर पोसायचे आहे की, अपराधींची जात धर्म न बघता शिक्षा देऊन सद्भावना पसरवण्यावर विचार व्हायला हवा. कोणतेही धार्मिक तेढ निर्माण करणारे वक्तव्य कोणीही करण्यापूर्वी विचार करावा. मग तो राजकीय, धार्मिक किंवा सामाजिक कोणताही नेता असला तरी त्यांच्यावर निर्बंध घालणे काही संविधानिक कायदे असायला हवेत. यासाठी योग्य नियमावली, कायदे येणे गरजेचे आहे. देशांतर्गत व देशाबाहेरील काही सत्ता देशातील शांतता व सुव्यवस्था भंग करू पाहत आहे. त्यांचा तो प्रयत्न हाणून पाडण्यासाठी संविधानिक कायदे आवश्यक आहेत.”