तीर्थंकार भगवान महावीर २५५० व्या निर्वाण महोत्सव
व्यवस्थापन समिति सदस्यपदी डॉ. कल्याण गंगवाल
पुणे: जैनांचे चोविसावे तीर्थंकार भगवान श्री महावीर स्वामी यांच्या २५५० व्या निर्वाण महोत्सव व्यवस्थापन समिति सदस्यपदी पुण्यातील शाकाहार कार्यकर्ते व सर्वजीव मंगल प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. कल्याण गंगवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मांगल्य उजावणी साजरी करण्यासाठी सांस्कृतिक व अन्य उपक्रमांच्या आयोजनासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ही समिती गठीत करण्यात आली आहे.
राज्याचे कौशल्य, रोजगार व उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या अध्यक्षतेखालील या समितीमध्ये डॉ. कल्याण गंगवाल यांच्यासह चैन्मुख संचेती, हितेश मुथा, सुरेंद्र शहा, ललित गांधी, नितीन वोरा, पवन सिंघवी या अशासकीय सदस्यांची, तर शिक्षण संचालक (माध्यमिक) व सांस्कृतिक कार्य विभागाचे संचालक या दोन शासकीय सदस्यांची नियुक्ती झालेली आहे. समितीच्या सर्व सदस्यांना वेगवेगळी कामे व अधिकार देण्यात आले आहेत.
भगवान महावीर कल्याणक महोत्सव समितीच्या माध्यमातून राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खासगी शाळांमधील ५ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी भगवान महावीरांच्या जीवनावर आधारित निबंध स्पर्धा आयोजिली जाणार आहे. त्यासाठी निबंध मसुदा तयार करण्याकरिता एक पुस्तिका शाळांना देण्यात येणार आहे. राज्याच्या ३६ जिल्ह्यांतील एक लाख शाळांमधून १.५ कोटी विद्यार्थी सहभागी होणार आहेत. निबंध स्पर्धेसाठी ५,५५,५५५/-, २,२२,२२२/- असे प्रत्येकी एक, तर ११,१११/- ची एकूण ३६ रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. यासह इतर सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन समितीमार्फत करण्यात येणार असल्याचे डॉ. कल्याण गंगवाल यांनी नमूद केले.