पुणे : रौप्य महोत्सवी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजमध्ये ‘शहीदो की शहादत’ या विशेष कार्यक्रमातून कारगिल युद्धातील शूरवीरांना मानवंदना देण्यात आली. कला, विज्ञान, वाणिज्य व एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला. प्राचार्य, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी कारगिल विजय दिवसाबाबत जाणून घेतले.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. ‘आपल्या सैनिकांचे धैर्य अतुलनीय आणि त्यांचे बलिदान अमूल्य होते. कारगिल युद्धातील या वीरांना आदरांजली अर्पण करतो आणि या विशेष दिवशी त्यांना सलाम करतो,’ असे प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी कार्यक्रमाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशात म्हटले आहे.
१९९९ मध्ये लडाखच्या उत्तरेकडील कारगिल जिल्ह्यातील पर्वत शिखरांवरून पाकिस्तानी सेनेला हुसकावून लावण्यासाठी झालेल्या युद्धात भारताने पाकिस्तानवर विजय मिळविला होता. हा दिवस दरवर्षी २६ जुलैला आपण पाकिस्तानवर मिळवलेला विजय दिवस म्हणून साजरा करतो. कारगिल विजय दिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी आपल्या भावना आणि आदर व्यक्त करण्यासाठी, तसेच कारगिल युद्धाच्या कथांवर आधारित नाटकात सक्रिय सहभाग घेतला. विज्ञान शाखेतील मुकुंद धर्मावत याने भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या भूमिकेत जात नाटक सादर करताना त्यांनी दिलेल्या भाषणाचे सादरीकरण केले. यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्याविष्कार सादर केले.
सूर्यदत्त ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्या किरण राव यांनी कारगिल युद्धात सहभागी असलेल्या आपल्या डॉक्टर भावाविषयीच्या आठवणी सांगितल्या. सर्व विद्यार्थी व शिक्षक सहकारी यामुळे भारावून गेले. अनेकांना आपल्या अश्रूंना आवर घालता आला नाही. त्यातील काहींनी आपल्या भारतीय सैन्यातील जवानांविषयी आणि त्यांच्या बलिदानाविषयी भावना व्यक्त केल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने केलेली सजावट लक्ष वेधून घेत होती.