भरतीच्या मागणीला विविध संघटनांचा जोरदार पाठिंबा; ६०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचा ठिय्या; २० रोजी बँकचा देशव्यापी संप
या भीषण कर्मचारी तुटवड्यामुळे कर्मचाऱ्यांवर प्रचंड मानसिक व शारीरिक ताण आहे, तसेच ग्राहक सेवा आणि बँकिंग कार्यक्षमतेवरही मोठा परिणाम होत आहे. मात्र, बँक व्यवस्थापन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहे. याशिवाय, व्यवस्थापनाने उच्च न्यायालयाचे आदेश, कामगार कायदे आणि द्विपक्षीय करारांकडे दुर्लक्ष करून मनमानी निर्णय घेतले आहेत. हा मनमानी कारभार थांबवला पाहिजे, असे तुळजापूरकर यांनी ठणकावून सांगितले.
या आंदोलनात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील विविध भागांतून मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. आंदोलन यशस्वी होण्यासाठी संयोजन सचिव कॉम्रेड शैलेश टिळेकर, सचिव धनंजय कुलकर्णी, महेश पारखी आणि पुण्यातील इतर सहकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली.
या गंभीर परिस्थितीच्या निषेधार्थ महाबँकेचे कर्मचारी २० मार्च रोजी देशव्यापी संपावर जाणार आहेत. २१ मार्च रोजी बँकिंग सेवा पूर्ववत होईल. त्यानंतर २२ आणि २३ मार्च या शनिवार-रविवारच्या नियमित सुट्यांनंतर २४ आणि २५ मार्च रोजी दोन दिवसांचा संप पुकारण्यात येईल, त्यामुळे बँकिंग सेवा पूर्णतः ठप्प राहील, असा निर्णय या सभेत घेण्यात आला.